यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम आवश्यक
- मुख्याध्यापक देविदास कोरे
निलंगा:-
कोणत्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठून यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अभ्यासातील सातत्य चिकाटी, वेळेचा सदुपयोग, सकारात्मक वृत्ती व कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी सोनखेड ता. निलंगा येथील चन्नबसवेश्वर विद्यालयाच्या तेवीसावा वर्धापन दिन व दहावी विद्यार्थी निरोपसमारंभा निमित्त सहवीस फेब्रुवारी सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार जिल्हा परिषद प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक बी. एम. पाटील, एस. के. स्वामी, शिवाजी भोसले, व्ही. टी. पाटील, एस. एन. सूर्यवंशी, एस. सी. पाटील उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक कोरे यांनी शालेय जीवनात वेळेला असलेले महत्व विषद करून आई वडील आपल्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कष्ट व मेहनतीची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेऊन त्यांच्या आशा आकांशा व स्वप्नपूर्तीसाठी प्राप्त वेळेचे योग्य नियोजन व सदुपयोग करून आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करावेत या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थाअध्यक्ष गोविंदराव गव्हाणे यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरु असलेल्या शाळेच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त करून शाळांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दहावीच्या मुला-मुलींनी आपल्या मनोगतातून हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार यांनी केले. एस. के. स्वामी यांनी वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या बावीस वर्षातील वाटचालीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शिवाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले व व्ही. टी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातृम गीताने झाली. यावेळी विध्यार्थीं, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
