पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

12 May 2016

समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी

देशाच्या विकासात आणि पायाभरणीत शिक्षणाला अनन्य  साधारण महत्व  आहे. समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षण  प्रभावी साधन आहे. म्हणून समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण सध्याचे वास्तव यापेक्षा वेगळे  असून हे चित्र दुर्देवी आहे. शिक्षणामुळे या देशातील गरिबी ,दारिद्रय कमी होईल , विषमता नाहीशी होईल असे म्हंटले  जाते. पण स्वातंत्र्यानंतरच्या  साठ वर्षानंतरही हे सध्या झाले आहे का ? उलट गरिबी व दारिद्रयात भर पडत नाही का ? ही विषमता कमी होण्याऐवजी का वाढत आहे ? हे आज पर्यंतच्या शिक्षणाचे यश आहे की अपयश ? सर्वच क्षेत्राच्या मुळाशी शिक्षण असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

  • शिक्षणातील विषमता चिंताजनक:
     सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करणे बंधनकारक आहे. त्या नुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तशी सोय व कायदाही केला आहे.  वरील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यावर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. या दृष्टीने शासनाचे व्यापक प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीची विषम स्थिती दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे.समाजातील सर्वच घटकांचा समान विकास घडून येण्यासाठी समान व सारख्या शाळातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. पण सध्याच्या शिक्षणात यापेक्षा वेगळे चित्र आढळते. सर्वसाधारण पणे शहरातील नगरपरिषदा , महनगरपालिकांच्या शाळांत दीनदलित , मजूर ,कामगार व गरिबांची मुले शिकताना आढळतात. तर ग्रामीण भागात शेतकरी , शेतमजुरांची मुले जिल्हापरीषदांच्या शाळांत बहुसखेने शिकताना दिसून येतात.शैक्षणिक वातावरणा आभावी दारिद्रय व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. बिकट परिस्थितीमुळे ते महागड्या खाजगी शाळात , शहरात  जाऊन शिकू शकत नाहीत. त्यांना शिकवणी वर्ग लावणे ही शक्य होत नाही. याउलट धनिकांची मुल सर्व प्रकारच्या सुविधा असणाऱ्या शाळांत देणग्या देवून शिकताना आढळतात .त्यांना शिकवणी वर्ग  , शैक्षणिक साधने व सुख सुविधा आसतात. म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. डॉक्टर ,  इंजिनियर , वकील , प्राध्यापक व अन्य क्षेत्रात ते पुढे असतात. या स्पर्धेत काही अपवाद वगळता सर्वसामान्य गोरगरिबांची मुले तग धरू शकत नाहीत. त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर धनिक अधिक धनिक बनतो. आणि विषमता कमी होण्या ऐवजी वाढते. म्हणून शिक्षणातील विषमता थांबवून समाजातील सर्व घटकांना समान व एकसारखे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
  • शहरी व ग्रामीण  भागातील दरी कमी व्हावी:
     शहरी  व ग्रामीण भागातील शिक्षणात काही प्रमाणात फरक दिसून येतो. शहरी भागात दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक सुविधाही असतात. शिकवणीवर्गाची ही  सोय  असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा कल शहरी भागाकडे वाढताना दिसून येतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काही शाळा पुढे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत , तर काही शाळा मुला अभावी ओस पडत आहेत. खेड्यातील शाळांना मुलांचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांची मनधरणी  करून शिक्षकांना मुलांची जमवा जमवी करावी लागत आहे. आशी स्थिती का ? निर्माण होत आहे. याचे आत्मपरीक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी करणे आवशक आहे.शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी अधिक जागरूक पणे लक्ष देताना दिसून येतात. त्यांना शैक्षणिक सुविधा व  साधणे ही पुरविली जतात. मुलांच्या अभ्यासाकडे  लक्ष्य दिले जाते. पण खेड्यात मात्र या पेक्षा वेगळी स्थिती आढळते. खेड्यातील पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फारसे जागरूक दिसत नाहीत.मुलांत ही शिक्षणाविषयी गांभीर्य आढळत नाही. शहरांच्या तुलनेत शैक्षणिक सुविधांचा ही आभाव जाणवतो. खाजगी शिकवणीवर्ग ही  नसतात. बरयाचदा पालक मुलामुलींना घरगुती व मजूराअभावी  शेतातील कामे लावताना दिसून येतात. त्यामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी होते. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही कच्चा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व निकाल खालावताना आढळतो.पालकांची मुलांच्या शिक्षणाविषयी असणारी उदासिनता. व शिक्षणाकडे पहाण्याची मानसिकता तसेच बहुसंख्य पालकांचा आडणीपणा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न व समस्या  निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात शिक्षणात तफावत व फरक दिसून येतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच पालकांचा शहराकडे शिक्षणासाठी वाढणारा कल कांही अंशी कमी होईल. देशातील वाढती गरिबी व विषमता कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना , तळागाळातील दीनदलित कामगार व गोरगरीबांच्या मुलामुलींना सारख्या व समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरच समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सारख्या प्रमाणात विकास होऊ शकेल व शैक्षणिक विषमता कमी होण्यास मदत होईल.
- देविदास कोरे  (लातूर)
मो. न - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gamil.com.

No comments:

Post a Comment